भारतीय वाद्यांचे वर्गीकरण
आपल्याला भारतीय वाद्यांची शास्त्रशुद्ध अशी चार प्रकारात केलेली विभागणी प्रथम, भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथात मिळते. हे चार प्रकार म्हणजे तारा असणारी, 'तंतूवाद्ये', बासरीसारखी फुंकून वाजवायची 'सुषिर वाद्ये', चामड्याने तोंड मढवून, त्यावर आघात करून, वाजवायची, पखवाजासारखी 'अवनद्ध वाद्ये' आणि धातूंची बनवलेली, एकमेकांवर आघात करून वाजवायची, टाळांसारखी 'घन वाद्ये'. ह्या चार प्रकारांचे वर्गीकरण भारतीय वाद्यांच्या बाबतीत नंतरच्या काळातही मान्य झालेले आहे, म्हणून या वर्गीकरणानुसार प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ व आधुनिक काळ, अशा तीन मुख्य कालखंडात, भारतीय वाद्यांचे वर्गीकरण केले गेले आहे.
ह्याच वाद्यांच्या चार प्रकारांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
i) तंतू वाद्ये - तारेचा उपयोग करून, आवाज निर्माण करणाऱ्या वाद्यास 'तंतू वाद्य' असे म्हणतात. तार छेडली असता त्यातून नाद निघणाऱ्या वाद्यास, 'तंतू वाद्य' असे म्हणतात. धनुष्याची दोरी हे तंतुवाद्याचे उगमस्थान मानले जाते.
तंतू वाद्यांचे दोन प्रकार आहेत
१] नखाने वाजणारी तत् वाद्ये - एकतारी, तुणतुणे, सतार, तानपुरा, वीणा, स्वर-मंडल इ.
२] गजाने वाजणारी वितत् वाद्ये - दिलरुबा, सारंगी, संतूर इ.
ii) सुषिर वाद्ये - हवेचा वापर करून, आवाज निर्माण करणाऱ्या वाद्यास, 'सुषिर वाद्य' असे म्हणतात. वेळूच्या वनात किंवा झाडाच्या फांद्यांच्या फटीतून हवा शिरून शीळ घातल्याप्रमाणे आवाज अथवा शंखात फुंकर घालून निघणारा आवाज, म्हणजे 'सुषिर वाद्ये' होय.
सुषिर वाद्यांचे दोन प्रकार आहेत
१] तोंडाने फुंकर मारून वाजणारी वाद्ये - शंख, शिंग, तुतारी, बासरी इ.
२] पत्तीच्या साहाय्याने वाजली जाणारी वाद्ये - सुंदरी, सनई (शेहनाई), बिगुल आणि हार्मोनियम इ.
iii) अवनद्ध वाद्ये - भांड्याच्या तोंडावर चामडे मढवून तयार करण्यात येणाऱ्या वाद्यास, 'अवनद्ध वाद्ये' असे म्हणतात. खोल खड्डा करून, त्याच्यावर निरुपयोगी प्राण्याचे कातडे ताणून, मढवून, त्यावर आघात केल्यास आवाज निर्माण होतो, असा शोध मानवास लागला. हेच या अवनद्ध वाद्यांचे उगमस्थान होय. दैनिक साहित्यात सापडलेले 'रणदुंदुभी' हे वाद्य त्याच प्रकारात येते. नगारा, ढोल, ताशा, ढोलकी, डफ, हलगी, दिमडी, मृदूंग, पखवाज, तबला अशा अनेक अवनद्ध वाद्यांना भारतीय संगीतात महत्वाचे स्थान आहे.
iv) घन वाद्ये - कुठल्याही भरीव वस्तूवर आघात करणाऱ्या वाद्यास, 'घन वाद्ये' असे म्हणतात. घन वाद्ये सुरात मिळवता येत नाहीत.
उदा. झांज, चिपळ्या, घंटा, धातूंचे त्रिकोण ( त्रिभुज ), घुंगरू इ.
या सर्वच वाद्यांना भारतीय संगीतात महत्वाचे स्थान आहे. या सगळ्या वाद्यांचा उपयोग भारतीय संगीतात, स्वरवाद्ये, तालवाद्ये व लयवाद्ये म्हणून केला जातो.
Recent Posts
See Allपखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...
भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...
पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...
Comments